शेतकऱ्याचे ठिबक सिंचन साहित्य जळून नुकसान
लोकचिंतन न्यूज एक्सप्रेस
तालुक्यातील काऊरवाडी (हिवरा) येथील शेतात असलेल्या वीज ट्रान्सफॉर्मरला शॉर्टसर्किटमुळे आग लागून शेतकऱ्याचे ठिबक सिंचनाचे साहित्य जळून सुमारे ३० ते ४० हजार रुपयांचे नुकसान झाल्याची घटना काल शुक्रवार दि. १३ मार्च रोजी घडली. या घटनेची चौकशी करून नुकसानभरपाई देण्याची मागणी शेतकऱ्याने केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, काऊरवाडी (हिवरा) येथील शेत सर्व्हे क्रमांक ५७/१ व ५७/२ मध्ये शेतकरी सुनील कांबळे यांच्या शेतात वीज वितरण कंपनीचा ट्रान्सफॉर्मर बसविण्यात आलेला आहे. शुक्रवारी ट्रान्सफॉर्मरमध्ये अचानक बिघाड होऊन शॉर्टसर्किट झाले. यामुळे ट्रान्सफॉर्मरमधील जळते तेल खाली पडून गवताला आग लागली. आगीच्या विळख्यात शेतातील जैन कंपनीचे तुषार सिंचनाचे पाईप व इतर साहित्य जळून खाक झाले. या घटनेत अंदाजे ३० ते ४० हजार रुपयांचे नुकसान झाल्याचे शेतकरी सुनील कांबळे यांनी सांगितले. त्यांनी या संदर्भात महागाव येथील महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीकडे लेखी निवेदन देऊन घटनास्थळी पाहणी करून झालेल्या नुकसानीची भरपाई देण्याची मागणी केली आहे. दरम्यान, वीज ट्रान्सफॉर्मरमधील बिघाडामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होण्याच्या घटना टाळण्यासाठी वीज वितरण कंपनीने वेळोवेळी देखभाल व दुरुस्ती करावी, अशी मागणी परिसरातील शेतकऱ्यांकडून केली जात आहे. संबंधित अधिकाऱ्यांनी तातडीने चौकशी करून शेतकऱ्याला न्याय द्यावा, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

