अनुदानावर डल्ला; मृत शेतकरी महिलेच्या खात्यातून रक्कम लंपास
सहकारी बँकिंग व्यवस्थेतील पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारा धक्कादायक प्रकार पुसद तालुक्यात उघडकीस आला आहे. माणिकडोह येथील एका मृत शेतकरी महिलेच्या बँक खात्यातून तब्बल ३२ हजार रुपये काढण्यात आल्याचा प्रकार समोर आला असून, या व्यवहारात बँक कर्मचारी आणि स्थानिक सोसायटी पदाधिकाऱ्यांचे संगनमत असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. साप्ताहिक लोकचिंतनने कालच्या इव्हिनिंग बुलेटीन मध्ये या प्रकरणाचा पर्दाफाश केल्यानंतर जिल्हा मध्यवर्ती बँकेत प्रचंड खळबळ उडाली आहे. या बातमीची दखल घेत जिल्हा मध्यवर्ती बँकेने पुसद शाखेचे दोन कर्मचारी व माणिकडोह सहकारी सोसायटीच्या सचिवाला कारणे दाखवा नोटीस बजावली असून, फौजदारी कारवाईचा बडगा उगारला आहे. याप्रकरणी सविस्त असे की, माणिकडोह येथील स्व.राजलीबाई गुलाब आडे यांचे यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या पुसद शाखेत बचत खाते होते. त्यांचे निधन २९ मे २०२१ रोजी झाले. मात्र, त्यांच्या मृत्यूनंतरही शासनाच्या विविध योजनेअंतर्गत रक्कम त्यांच्या खात्यात जमा होत राहिली. सन २०२२-२३ मध्ये अतिवृष्टी अनुदान व पीएम किसान योजनेतील रक्कम मिळून खात्यात ३२ हजार ५३९ इतकी शिल्लक होती. दरम्यान, १२ डिसेंबर २०२२ रोजी या खात्यातून ३२ हजार रु. रक्कम काढण्यात आली. विशेष म्हणजे, संबंधित खातेदाराचा मृत्यू झालेला असताना आणि खात्यावर सही नमुना उपलब्ध नसतानाही हा व्यवहार मंजूर करण्यात आल्याचे तपासात स्पष्ट झाले आहे.
नियम डावलून थर्ड पार्टी विड्रॉल मंजूर
बँकेच्या नियमानुसार सन २०१६ पासून थर्ड पार्टी विड्रॉल बंद असताना देखील या खात्यातून थर्ड पार्टी नावाने व्यवहार करण्यात आला. कंत्राटी लिपिकाने विड्रॉल प्रक्रिया पूर्ण केली, तर दुसऱ्या अधिकाऱ्याने कोणतीही वैध पडताळणी न करता व्यवहार पास केल्याचे उघड झाले आहे. विड्रॉल तपशिलात माणिकडोह येथील सोसायटी सचिवाचे नाव नमूद असल्याने संशय कल्लोळ वाढला आहे.
शाखा व्यवस्थापक, रोखपाल आणि सचिवास शो कॉज
मृतक शेतकरी महिलेच्या खात्यातून परस्पर पैसे लंपास केल्याचे प्रकरण उघड होताच बँक प्रशासनात प्रचंड खळबळ उडाली असून जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या पुसद शाखेचे तत्कालीन व्यवस्थापक तथा महागाव शाखेचे विद्यमान व्यवस्थापक विनायक घुगे, पुसद शाखेचे तत्कालीन रोखपाल श्रीकांत जाधव, आणि माणिकडोह विविध कार्यकारी सोसायटीचे सचिव उद्धव कऱ्हाळे यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. बँकेची दिशाभूल करून आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा का दाखल करू नये? असा सवाल नोटीसमध्ये करण्यात आला असून, समाधानकारक खुलासा न दिल्यास कठोर कारवाईचा इशारा देण्यात आला
घोटाळ्याची उच्चस्तरीय चौकशी करा !
शेतकरी नेते पंजाबराव देशमुख खडकेकर यांनी विभागीय आयुक्तांकडे तक्रार दाखल करत उच्चस्तरीय चौकशी व दोषींवर फौजदारी कारवाई करण्याची मागणी केली आहे. तसेच, हा एकच घोटाळा नसून इतर मृत शेतकऱ्यांच्या खात्यांमधून अशा प्रकारे पैसे काढले गेले असण्याची शक्यता आहे, असा गंभीर आरोप त्यांनी केला आहे. नेमके किती मृतक ग्राहकांच्या खात्यामधून परस्पर पैसे विड्रॉल करण्यात आले याची चौकशी होईपर्यंत आपण स्वस्थ बसणार नाही असा इशारा पंजाबराव देशमुख खडकेकर यांनी दिला आहे.

