शेतोपयोगी साहित्य जळून भस्मसात
गुंज शिवारात आज शुक्रवारी दुपारी अचानक लागलेल्या आगीत शेतकरी आकाश भगवान यादव यांचा गोठा जळून खाक झाला. या आगीत शेतीसाठी वापरण्यात येणारे साहित्य तसेच जनावरांसाठी साठवून ठेवलेली वैरण पूर्णतः जळून भस्मसात झाल्याने शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. प्राप्त माहितीनुसार, आकाश यादव यांच्या शेत सर्वे नंबर २८५ गट क्रमांकातील गोठ्याला अचानक आग लागली. दुपारच्या सुमारास यादव शेतात गेले असता गोठ्याला आग लागल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यांनी व परिसरातील नागरिकांनी आग विझवण्याचा प्रयत्न केला, मात्र पाण्याअभावी आग आटोक्यात आणणे शक्य झाले नाही. या आगीत ट्रॅक्टरचे साहित्य, नांगरटीची अवजारे, स्प्रिंकलरचे पाइप तसेच इतर शेतोपयोगी साहित्य जळून खाक झाले. याशिवाय जनावरांसाठी साठवून ठेवलेली वैरणही आगीच्या भक्ष्यस्थानी पडली. अचानक लागलेल्या या आगीमुळे शेतकऱ्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. घटनेचा पंचनामा करून आपत्ती व्यवस्थापन विभागामार्फत आर्थिक मदत देण्याची मागणी ग्रामस्थ व शेतकरी वर्गातून करण्यात येत आहे.

