टोल नाका बंद करून पोलीस अधिकाऱ्यास बडतर्फ करा !
महागाव पत्रकार महासंघाचे निवेदन
दारव्हा तालुक्यातील कारंजा येथील टोल नाक्यावरील आंदोलनादरम्यान संपादकाशी हमरीतुमरी व धक्का बुक्की केल्याप्रकरणी सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज दाभाडे यांच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी महागाव तालुका पत्रकार महासंघाच्या वतीने करण्यात आली. तहसीलदार अभय मस्के यांच्या मार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे याबाबत निवेदन सादर करण्यात आले. २३ मार्च २०२६ रोजी राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ३६१ सी वरील भुलाई टोल प्लाझा बंद करण्यासाठी महाविकास आघाडीचे आंदोलन सुरू होते. या आंदोलनाचे वृत्त संकलन करण्यासाठी विविध प्रिंट व इलेक्ट्रॉनिक माध्यमांचे प्रतिनिधी घटनास्थळी उपस्थित होते. कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पोलिसांनी दारव्हा येथे बॅरिकेड्स लावून रस्ता काही काळासाठी बंद केला होता. ओळख पटवल्यानंतर माध्यम प्रतिनिधींना टोलनाक्याकडे जाण्याची परवानगीही देण्यात आली होती. मात्र, याच दरम्यान कर्तव्यावर तैनात असलेले एपीआय पंकज दाभाडे यांनी अचानक अक्रस्ताळी भूमिका घेत काही नागरिक व पत्रकारांना हाकलण्यास सुरुवात केली. दैनिक लोकसूत्रचे कार्यकारी संपादक केशव सवळकर हे वृत्तसंकलनासाठी तेथे उपस्थित असताना त्यांच्यासोबत धक्काबुक्की करत अपमानास्पद वर्तन करण्यात आले. सवळकर यांनी स्वतःचे ओळखपत्र दाखवूनही दाभाडे यांनी त्यांच्याशी उद्धट भाषेत बोलत हमरीतुमरी केली. घटनास्थळी इतर पोलीस अधिकारी उपस्थित असूनही केवळ दाभाडे यांनीच आक्रमक पवित्रा घेतल्याने पत्रकारांमध्ये संताप व्यक्त होत आहे. या प्रकारामुळे पत्रकारितेच्या प्रतिष्ठेला धक्का बसल्याची भावना व्यक्त होत आहे. पुढे वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या हस्तक्षेपानंतर हा वाद सामोपचाराने मिटवण्याचा प्रयत्न झाला, मात्र संबंधित अधिकाऱ्यांच्या गैरवर्तनाबाबत नाराजी कायम असल्याचे पत्रकार महासंघाने स्पष्ट केले आहे. या पार्श्वभूमीवर एपीआय पंकज दाभाडे यांच्यावर सेवाशिस्तभंग व गैरवर्तनाच्या आरोपांखाली कठोर कारवाई करून सेवेतून बडतर्फ करण्यात यावे, अशी मागणी महागाव तालुका पत्रकार महासंघाने केली. पत्रकार महासंघाने आज एक निवेदन तहसीलदारांमार्फत मुख्यमंत्र्यांना पाठवले. निवेदन देताना पत्रकार महासंघाचे अध्यक्ष गणेश भोयर, मार्गदर्शक संजय भगत, गजानन वाघमारे, विनोद कोपरकर,अमोल राजवाडे, नंदकुमार कावळे, निलेश पाटील नरवाडे, डॉ. गजानन वैद्य, धम्मानंद कावळे, रियाज पारेख, राज पाटील नरवाडे, मनोज सुरोशे, बाळुभाऊ राठोड, अजय पाचंगे उपस्थित होते.

