शेतकरी हवालदिल
लोकचिंतन न्यूज एक्सप्रेस
महागाव तालुक्यातील गुंज सबस्टेशनवरून सुरू असलेल्या एजी पंपांचा वीजपुरवठा मागील तीन दिवसांपासून खंडित असल्याने परिसरातील शेतकरी मोठ्या अडचणीत सापडले आहेत. उन्हाळ्याची तीव्रता वाढत असताना पिकांना पाणी देणे अत्यावश्यक असताना वीजपुरवठा बंद झाल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. प्राप्त माहितीनुसार, अधीक्षक अभियंता यांच्या आदेशानुसार रविवार (१५ मार्च २०२६) पासून एजी पंपांवरील रात्रीचा सिंगल फेज विद्युत पुरवठा बंद करण्यात आला आहे. गुंज ते धनोडा–पोहंडूळ या फिडरवरील सिंगल फेज लाइनवर अवलंबून असलेल्या अनेक गावांतील शेतकऱ्यांना याचा फटका बसला आहे. या सिंगल फेज लाईनवर केवळ एजी पंपच नव्हे तर परिसरातील हॉटेल, किराणा दुकाने, मोटरसायकल दुरुस्ती केंद्रे, हेअर सलून आणि कापड दुकानेही अवलंबून आहेत. त्यामुळे रात्री वीजपुरवठा बंद राहिल्याने व्यापारी वर्गही अडचणीत आला आहे. रात्री अंधार पसरल्यामुळे चोरीच्या घटनांमध्ये वाढ होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. तसेच रात्री शेतात जाणाऱ्या नागरिकांवर जंगली जनावरांकडून हल्ला होण्याचा धोका असल्याची भीतीही व्यक्त होत आहे. स्थानिक नागरिकांच्या मते, अनेक लाईनमन पुसद येथून ये-जा करत असल्याने ते मुख्यालयी राहत नाहीत. परिणामी शिरपूर गावात वीजपुरवठा खंडित झाल्यास पुढील धनोडा ते पोहंडूळपर्यंत संपूर्ण लाईन बंद राहते. मागील दोन वर्षांपासून उपकार्यकारी अभियंता पद प्रभारावर असल्याने वीज वितरण व्यवस्थेवर योग्य नियंत्रण राहत नसल्याची तक्रार नागरिकांनी केली आहे. दरम्यान, १३ मार्चपासून गुंज सबस्टेशनवरून एजी पंपांचा वीजपुरवठा बंद असल्याने शेतकऱ्यांना मोठा फटका बसत आहे. वीज वितरण कंपनीचे अधिकारी व कर्मचारी वसुलीसाठी सक्रिय असताना एजी पंपांना नियमित वीजपुरवठा का दिला जात नाही, असा सवालही शेतकरी उपस्थित करत आहेत. खडका येथील सोलार प्लांट सुरू झाल्यानंतर एजी पंपांचा वीजपुरवठा सुरळीत मिळणे अपेक्षित होते. मात्र सध्या धनोडा, काळी (दौलत) आणि सवना या तीन फिडरवर सोलार प्लांटची लाईन दिल्यामुळे त्यावर अतिरिक्त भार पडत असल्याची माहिती समोर येत आहे. या पार्श्वभूमीवर एजी पंपांवरील रात्रीचा वीजपुरवठा पूर्ववत सुरू करण्यात यावा, अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे. अन्यथा आंदोलनाचा मार्ग आवलंबावा लागेल असा इशारा पंजाबराव खडकेकर यांनी दिला आहे.

