गौळ राऊतवाडी येथील श्री हनुमान मंदिर हे सुमारे ५०० वर्षांची परंपरा लाभलेले प्राचीन धार्मिक स्थळ असून, आजही ते भाविकांच्या श्रद्धेचे केंद्र म्हणून ओळखले जाते. ऐतिहासिक पार्श्वभूमी, भक्तीभाव आणि ग्रामस्थांच्या प्रयत्नांमुळे हे मंदिर केवळ धार्मिक स्थळ न राहता सामाजिक एकजुटीचे आणि विकासाचे प्रतीक ठरले आहे. सन १९४७ मध्ये खडका येथील पुरोहित आणि बजाज व्यापाऱ्यांनी मंदिराशी संबंधित नोंदणी करून हनुमंत रायाविषयी असलेली आपली निष्ठा जपली. त्या काळात ‘हनुमान पावले’ असल्याची श्रद्धा व्यक्त केली जात होती. त्यांच्या भक्तीतूनच मारुतीचा ओटा बांधण्यात आला आणि धार्मिक परंपरेची पायाभरणी झाली. पुढील अनेक दशकांत ही परंपरा अविरतणे सुरू राहिली. मंदिराच्या विकासासाठी सन २०१० मध्ये विश्वस्त समितीची स्थापना करण्यात आली. अध्यक्ष विजयराव देशमुख, उपाध्यक्ष रामजी नाईक, सचिव पांडुरंग बोडके, सहसचिव विलास कोथळे आणि सदस्य पांडुरंग पाटील पोहंडुळ यांच्या नेतृत्वाखाली मंदिराच्या उभारणीला नवे बळ मिळाले. अनेक अडचणी आणि प्रतिकुल परिस्थिती असतानाही समितीने जिद्दीने काम पुढे नेले. या उपक्रमासाठी माहूरगड येथील महंत प. पू. मधुसूदन भारती महाराज यांचे मार्गदर्शन लाभले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली सभामंडपाचे बांधकाम यशस्वीरित्या पूर्ण झाले. शासनाकडून सुमारे ३० लाख रुपयांची आर्थिक मदत मिळाल्यामुळे विकासकामांना गती मिळाली. मंदिराशी निगडित परंपरांमध्ये पोळ्याच्या सणानिमित्त भरवली जाणारी यात्रा विशेष आकर्षण ठरते. तसेच प्रत्येक शनिवारी ‘रोठ’ हा प्रसाद वाटप करण्याची परंपरा आजही जपली जाते. विकासकामांमध्ये भुसारे सर आणि पंजाबराव देशमुख खडकेकर यांचे मोलाचे योगदान लाभले. माजी जिल्हा परिषद सदस्य दीपक पाटील राऊत यांनी मंदिरापर्यंत रस्त्याची सोय करून दिली, तर पाण्याच्या सुविधेसाठीही प्रयत्न करण्यात आले. विशेष म्हणजे, मंदिर परिसरात सुमारे दीड हजार झाडांचे वृक्षारोपण करण्यात आले असून त्याचे संगोपनही काळजीपूर्वक केले जात आहे. त्यामुळे हे ठिकाण धार्मिकतेबरोबरच पर्यावरण संवर्धनाचा संदेश देणारे आदर्श केंद्र ठरत आहे. आज गौळ राऊतवाडीचे श्री हनुमान मंदिर हे श्रद्धा, परंपरा, ग्रामविकास आणि पर्यावरण जपण्याच्या जाणीवेचा प्रेरणादायी संगम म्हणून ओळखले जात आहे.

