श्री कॉम्प्युटर अॅण्ड अभ्यासिका, महागांव यांचा पुढाकार
डिजिटल युगात इंटरनेट, स्मार्टफोन आणि ऑनलाईन व्यवहारांचा वाढता वापर पाहता सायबर फसवणुकीचे प्रमाणही दिवसेंदिवस वाढत आहे. या पार्श्वभूमीवर नागरिकांमध्ये सायबर सुरक्षेबाबत जागरूकता निर्माण करणे अत्यंत गरजेचे बनले आहे. याच उद्देशाने श्री कॉम्प्युटर अॅण्ड अभ्यासिका, महागांव यांच्या वतीने सायबर सुरक्षा जागरूकता आणि संभाव्य फसवणूक टाळण्यासाठी मार्गदर्शन करण्यात आले आहे.
सायबर सुरक्षा जागरूकता म्हणजे इंटरनेटचा वापर करताना होणारे धोके ओळखणे तसेच स्वतःची वैयक्तिक माहिती, डेटा आणि डिजिटल डिव्हाइस सुरक्षित ठेवणे होय. सध्या एपीके फाइल्स, बनावट फोन कॉल्स, एसएमएस व लिंकद्वारे नागरिकांची फसवणूक केली जात आहे. त्यामुळे नागरिकांनी अधिक सावध राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. मार्गदर्शनात चार प्रमुख सायबर धोके अधोरेखित करण्यात आले. त्यामध्ये फिशिंगद्वारे बनावट ईमेल किंवा संदेश पाठवून संवेदनशील माहिती चोरणे, मालवेअरद्वारे व्हायरस, रॅन्समवेअर किंवा स्पायवेअर पसरवणे, वैयक्तिक माहितीचा गैरवापर करून आर्थिक फसवणूक करणे आणि सोशल इंजिनिअरिंगच्या माध्यमातून लोकांची दिशाभूल करून माहिती मिळवणे यांचा समावेश आहे.
फसवणूक टाळण्यासाठी महत्त्वाच्या सूचना
नागरिकांनी आपले पासवर्ड, पिन किंवा ओटीपी कोणासही शेअर करू नये, प्रत्येक खात्यासाठी वेगळा व मजबूत पासवर्ड वापरावा, तसेच अनोळखी ईमेल, लिंक किंवा फाइल्स उघडू नयेत, असे आवाहन करण्यात आले.
डिव्हाइसवरील सॉफ्टवेअर व अँटीव्हायरस नियमित अपडेट ठेवणे, सार्वजनिक वाय-फाय टाळणे, टू-फॅक्टर ऑथेंटिकेशनचा वापर करणे आणि बँक व्यवहारांची नियमित तपासणी करणे आवश्यक असल्याचेही सांगण्यात आले.
स्मार्टफोन वापरकर्त्यांसाठी विशेष मार्गदर्शन
सध्या चर्चेत असलेल्या स्मार्टफोनवरील सायबर फसवणुकांपासून वाचण्यासाठी फक्त अधिकृत अॅप स्टोअरमधूनच अॅप्स डाउनलोड करावेत, बनावट फिशिंग कॉल्स व मेसेजेसपासून सावध रहावे आणि कोणत्याही परिस्थितीत ओटीपी शेअर करू नये, असे स्पष्ट करण्यात आले. तसेच यूपीआय व्यवहार करताना आलेल्या अनोळखी ‘मनी रिक्वेस्ट’ स्वीकारू नयेत, सार्वजनिक चार्जिंग स्टेशनवर फोन चार्ज करताना ‘ज्यूस जॅकिंग’चा धोका लक्षात घ्यावा आणि वायरलेस नेटवर्क सुरक्षित ठेवावे, असेही नमूद करण्यात आले आहे.
फसवणूक झाल्यास काय करावे?
सायबर फसवणूक झाल्यास त्वरित डिव्हाइस इंटरनेटपासून डिस्कनेक्ट करणे, संबंधित बँकेशी संपर्क साधणे, स्थानिक पोलीस किंवा सायबर क्राइम विभागाकडे तक्रार नोंदवणे आणि सर्व पुरावे जतन करणे आवश्यक आहे. याशिवाय राष्ट्रीय सायबर हेल्पलाईन १९३० वर किंवा cybercrime.gov.in या संकेतस्थळावर तक्रार करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. सायबर सुरक्षिततेबाबत अधिक माहिती व मार्गदर्शनासाठी नागरिकांनी श्री कॉम्प्युटर अॅण्ड अभ्यासिका, तहसील समोर, गंगात्रे कॉम्प्लेक्स, महागांव येथे संपर्क साधावा, असे आवाहन संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे.

