संतप्त ग्रामस्थांचा पोलीस ठाण्यावर ठिय्या
लोकचिंतन न्यूज एक्सप्रेस
खेड्यापाड्यात अवैध दारूचा महापूर उसळल्याचा धक्कादायक प्रकार महागाव तालुक्यात दिसत आहे. आमणी (खुर्द) या लहानशा गावात तब्बल २० हातभट्ट्या सुरू असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला असून, विषारी दारू प्राशनामुळे एका तरुणाचा मृत्यू झाल्याने गावात संतापाची लाट उसळली आहे. या पार्श्वभूमीवर आज बुधवारी सायंकाळी सुमारे ८ वाजता ३०० हून अधिक संतप्त नागरिकांनी महागाव पोलीस ठाण्यावर धडक देत ठिय्या आंदोलन छेडले.
गावातील एका तरुणाचा लिव्हर निकामी झाल्याने मृत्यू झाला. कुटुंबीय आणि ग्रामस्थांचा आरोप आहे की, हा मृत्यू गावात खुलेआम विक्री होणाऱ्या विषारी दारूमुळे झाला. “आमच्या डोळ्यांसमोर तरुण पिढी उद्ध्वस्त होत आहे. कित्येक युवक व्यसनाधीन झाले असून कुटुंबे रस्त्यावर आली आहेत,” अशी संतप्त प्रतिक्रिया ग्रामस्थांनी दिली. ‘दारू विक्रेत्यांना अटक झाल्याशिवाय हलणार नाही’ पोलीस ठाण्यावर जमलेल्या नागरिकांनी ठाम भूमिका घेतली की, “जोपर्यंत अवैध दारू विक्रेत्यांना पकडून ठाण्यात आणले जात नाही, तोपर्यंत आम्ही येथून हलणार नाही.“आमच्या गावातील दारू तात्काळ बंद करा,” अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला.
ग्रामस्थांच्या मते, अवैध दारूविक्रीबाबत वारंवार तक्रारी करूनही पोलिसांनी गांभीर्याने दखल घेतली नाही. त्यामुळे प्रशासनावरील अविश्वास अधिकच वाढला आहे.
तणावपूर्ण वातावरण
रात्री उशिरापर्यंत नागरिकांनी पोलीस ठाण्यात ठिय्या मांडल्याने तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली होती. पोलिसांनी ग्रामस्थांशी चर्चा करून कारवाईचे आश्वासन दिल्याची माहिती मिळाली असली तरी प्रत्यक्षात ठोस पावले उचलली जातील का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. ग्रामीण भागात वाढत चाललेल्या अवैध दारूच्या जाळ्यामुळे सामाजिक व आरोग्यविषयक प्रश्न गंभीर बनत आहेत. आमणीतील घटना ही केवळ एका गावाची बाब नसून राज्यातील ग्रामीण भागात वाढणाऱ्या हातभट्ट्यांच्या समस्येचे दाहक उदाहरण असल्याचे मत जाणकार व्यक्त करत आहेत.
आता प्रशासन तातडीने कठोर कारवाई करून अवैध दारूचा विळखा तोडते का, की ग्रामस्थांचा संताप आणखी तीव्र होतो, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

